Wednesday, November 12, 2008

चार दिनोंका प्यार. .

आजचा दिवस फक्त हे आणि हेच गाणं ऐकलंय. . . . . . . :)

चार दिनोंकाऽ प्यार ओ रब्बाऽऽ, लंबी जुदाई लंबी जुदाई
चार दिनोंकाऽ प्यार ओ रब्बाऽऽ, लंबी जुदाईऽऽ लंबी जुदाई. . .

तेरे बिन दिल मेरा लागे कहींऽ ना, तेरे बिन जांऽ मेरी जाए कहीं ना
कितने जमानेऽऽ बाद ओ रब्बाऽ, याद तू आया, याद तू आऽऽया. . .

खोया रहा हूं सासोंमें अपने, आहट भी तेरीऽऽऽ भूल गया हूं
इतना जिया हूं, तनहा रहा हूंऽऽऽ, इश्क तेराऽऽऽ भूल गया हूं. . .

खोया रहा हूं सासोंमें अपने, आहट भी तेरीऽऽऽ भूल गयाऽ हूं
इतना जिया हूं, तनहा रहा हूंऽऽऽ, इश्क तेराऽऽऽ भूल गयाऽ हूं. . .

उलझा रहा में इस जिंदगी में, दिलकी दुहाई दिलकी दुहाऽऽई

तेरे बिन दिल मेरा लागे कहीं ना, तेरे बिन जां मेरी जाए कहीं ना
कितने जमाने बाद ओ रब्बाऽऽ, याद तू आया, याद तू आऽऽया. . .

हर बेबसीऽ ने, इस जिंदगीऽ ने, तुझको ही चाहा, तुझको ही मांऽगा
जिन रास्तोंसे गुजरा ये दिल थाऽऽ, मंजिल मिली नाऽऽ प्यार ना पाऽऽया. . .

हर बेबसीऽ ने, इस जिंदगीऽ ने, तुझको ही चाहा, तुझको ही मांऽगा
जिन रास्तोंऽसे गुजरा ये दिल था, मंजिल मिली नाऽऽ प्यार ना पाऽऽया. . .

खुद को छुपाके राहोंसे गुजरेऽऽ, दिल को संभाले दिल को संभाऽऽले

तेरे बिन दिल मेरा लागे कहीं ना, तेरे बिन जांऽऽ मेरी जाए कहीं ना
कितने जमानेऽ बाद ओ रब्बा, याद तू आया, याद तूऽ आऽऽया. . . . .

Friday, April 18, 2008

शुद्धलेखन तपासण्याची सोपी क्लृप्ती

मराठीत लिहायचं म्हणलं की बऱ्याच वेळा घोडं अडतं शुद्धलेखनापाशी. लेखनाच्या ह्या चुका जेवताना कचकन् दाताखाली येणाऱ्या खड्यांसारख्या लागतात. लहानपणी 'शुद्धलेखन' असा एक तेव्हा तापदायक वाटणारा प्रकार असायचा. त्याचा भयंकर तिटकारा होता. व्याकरणाच्या पुस्तकात शुद्धलेखनाचे नियम वगैरे असायचे पण ते वाचायला ठीक आहेत, लिहिताना लक्षात ठेऊन योग्य वेळेला ते वापरणे म्हणजे महाकर्मकठीण.(?)

त्यावर मी एक साधी सोपी युक्ती वापरतो. काय करायचं की -

१. आपल्याला जो लेख लिहायचा आहे तो आधी पूर्ण लिहायचा.

२. मग त्यात जे शब्द चुकीचे लिहिले गेले आहेत असं वाटत असेल ते शब्द वेगळे काढायचे.

३. मग एक एक करून गुगलवर(www.google.com) प्रत्येक शब्द शोधायचा व तो शब्द कितीवेळा गुगलला आढळला ते पहायचं उदा. वरच्या वाक्यातून 'चुकीचे' हा शब्द घेऊ.

४. मग तोच शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहून गुगलवर शोधायचा. उदा. 'चुकिचे', 'चूकिचे', 'चूकीचे', 'चुकीचे' वगैरे. यातले बरेचसे चूक आहेत असं आपला आतला(:)) आवाजच सांगतो.





५. ज्या रूपासाठी सर्वात जास्त 'निकालांचा' कौल मिळेल तो शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर असे मानायला हरकत नाही. इथे - 'चुकीचे' ह्या शब्दाचे शोधनिकाल सर्वात जास्त आहेत.

ह्याच शोधपद्धतीची जरा सुधारित आवृत्ती म्हणजे आपला शब्द एखाद्या विशिष्ठ संकेतस्थळावरच शोधायचा उदा. www.esakal.com. गुगलच्या शोधचौकटीत [ चुकीचे site:www.esakal.com] असे लिहून हे करता येते.

असे करण्याचे कारण म्हणजे ह्या(व अशा वृत्तपत्रीय) संकेतस्थळांवरील लेखन इतर कुठल्याही 'पब्लिक वेबसाईट/फोरम' पेक्षा शुद्ध असते(किंवा तसे अपेक्षित आहे). तसेच ह्या संकेत स्थळांवर शोधल्याने गुगल जे हिंदी निकाल दाखवतो त्याचे प्रमाण शून्य होते. बरेच तत्सम शब्द मराठी व हिंदी भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिले जातात.


याखेरीज गमभन चिकित्सा , शब्दकोशात शोधणे असे अनेक पर्याय आहेत. पण या सर्वांत मला हीच पद्धत सोपी वाटते. शुद्धलेखनाचे नियम लक्षात नसतील तरी हरकत नाही.

ताक : मॅटरच्या ह्या लेखावरून प्रेरित.

Tuesday, April 1, 2008

अनिता सुभाषचंद्र बोस - Anita Bose Pfaff

कोणाही थोरामोठ्यांची चरित्रे वाचताना - अमुक अमुक व तमुक तमुक यांच्या पोटी, या या ठिकाणी, ह्या ह्या वर्षी यांचा जन्म झाला वगैरे वाक्ये हटकून सापडतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या थोर नेत्यांची माहिती कमीजास्त प्रमाणात प्रत्येकाला असतेच. पण त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांचे काय झाले, सध्या ते कुठे असतात याबद्दल फार कमी माहिती सापडते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक वादळी व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. महान नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एकेकाळचे कॉंग्रेसचे अध्यक्ष, 'जय हिंद' चा नारा देणारे, 'आझास हिंद सेनेचे' नेतृत्व करणारे, देशासाठी अखेरपर्यंत लढत रहाणारे व एक दिवस अचानक नाहीसे होणारे नेताजी सर्वांनाच ज्ञात आहेत. पण त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचे काय? किंबहुना त्यांच्या रक्ताचे कोणी सध्या अस्तित्वात आहे काय? - तर होय, आहे. त्याबद्दल ही थोडीशी माहिती.

१९३३ ते १९३६ या काळात औषधोपचारांसाठी सुभाषबाबू युरोपात होते. युरोपात असताना ते एक पुस्तकही लिहीत होते त्यासाठी त्यांना इंग्रजी व स्थानिक युरोपिअन भाषा जाणू शकणाऱ्या सहाय्यकाची गरज होती. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे असताना त्यांची ओळख एमिली (Emilie Schenkl) नावाच्या ऑस्ट्रियन युवतीशी झाली. एमिलीने त्यांची सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. कालांतराने डिसेंबर १९३७ मध्ये त्यांनी Bad Gastein या ठिकाणी एमिलीशी विवाह केला.

दरम्यानच्या काळात सुभाषाबाबू भारतात परतले. पुढे १९३८ मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्षपद, राजीनामा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नजरकैद व पलायन यानंतर ते पुन्हा एकदा अफगाणिस्थान मार्गे युरोपात पोहोचले.

सुभाषबाबू व एमिली यांच्या मुलीचे नाव 'अनिता'. १९४२ साली व्हिएन्ना येथे 'अनिता बोस' यांचा जन्म झाला. अनिताच्या जन्मानंतर लगेचच १९४३ च्या सुरुवातीला जर्मन पाणबुडीतून सुभाषबाबू आशियात यायला निघाले. त्यामुळे १९४५ साली जेव्हा विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला(किंवा असे मानले जाते) तेव्हा अनिताचे वय साधारण तीन वर्षे असावे. पुढे दोन वर्षांनी फाळणीचे दु:ख सोसावे लागले. सुभाषबाबू ज्यासाठी आयुष्यभर झटले ते स्वातंत्र्य मिळाले, पण स्वतंत्र भारत पहायला मात्र ते नव्हते. अनिता मात्र त्यामुळे ऑस्ट्रियातच राहिल्या. नंतर कित्येक वर्षे लोटली. त्यांच्याबद्दल फारसं काही कधी ऐकिवात आलंच नाही. सध्या त्या 'युनिव्हर्सिटी ऑफ ऑग्सबर्ग' येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यांच्या पतीचे नाव मार्टिन प्फफ. त्यांना पीटर अरूण, थॉमस कृष्णा व माया करिना ही तीन मुले आहेत. स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये पंडित नेहरू यांच्या आग्रहाखातर त्या भारतात आल्या होत्या. त्यानंतरही किमान १०-१५ वेळा त्या भारतात येऊन गेल्या आहेत.

त्यांच्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हे त्यांचे पान पहा.
http://www.wiwi.uni-augsburg.de/vwl/extraord/pers/apfaff.htm



Monday, March 31, 2008

कृष्णा ओमप्रकाश शर्मा - Chris Sharma

आपल्यासारख्या राकट कणखर दगडांच्या देशातल्या लोकांसाठी डोंगर, पर्वत, कडे-कपाऱ्या खरंतर काही नवीन नाहीत. सह्याद्रीत पदभ्रमण(Trekking) करणे, गडकिल्ल्यांच्या वाऱ्या करणे हे तर आपल्याकडचे आवडते छंद. हरीश कपाडिया, आनंद पाळंदे, निनाद बेडेकर यांनी अनेक पुस्तके लिहून त्यात मोलाची भर घातली आहे. डोंगरयात्रा, साद सह्याद्रीची - भटकंती किल्ल्यांची, आव्हान ही पुस्तके केवळ अप्रतीम. ट्रेकर्ससाठी भगवद् गीताच या. पदभ्रमणाबरोबरच प्राणी/पक्षी निरीक्षण, निसर्ग निरीक्षण व संवर्धन, छायाचित्रण वगैरे उपछंद ही बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. पण त्यामानाने कातळारोहण किंवा प्रस्तरारोहण(Rock Climbing) हा तसा दुर्लक्षित छंद. बोल्डरींग(Bouldering) यासाठी तर मराठी प्रतिशब्द अजून तयार व्हायचा असावा.

युरोप व अमेरिकेत मात्र हा धाडसी छंद फक्त छंद आहे असं नाही तर त्याला क्रिडाप्रकार म्हणूनही मान्यता आहे. अमेरीकेतील या खेळाचा सम्राट आहे "कृष्णा शर्मा".

पुर्ण नाव - "कृष्णा ओमप्रकाश शर्मा". नाव जरी भारतीय किंवा देसी असलं तरी हा माणूस भारतीय नाही. कॅलिफोर्नियामध्ये सॅन्ताक्रुज या ठिकाणी २३ एप्रिल १९८१ साली धर्मांतरीत हिंदू (हिप्पी?) आई-वडीलांच्या पोटी याचा जन्म झाला. आई गिता जॉन व वडील बॉब शर्मा हे बाबा हरिदास यांचे शिष्य. कृष्णाला त्याचे नाव बाबा हरिदास यांनीच दिले. नंतर त्याचे क्रिस झाले.

कातळारोहण व बोल्डरींग हे जात्याच अवघड क्रिडाप्रकार आहेत. कातळारोहणामध्ये कडा चढत असताना निसर्ग दयामाया दाखवत नाही, खोबणीतला हात किंवा पाय सुटला तर प्राणाशीच गाठ. (त्यामुळे जर हात पाय सुटला तर दरीत पडून मृत्यू ओढवू नये म्हणून फक्त आधारासाठी दोराचा वापर करतात.) अशा या खेळातले क्रिसने नैपुण्य पाहून थक्क व्हायला होतं. इतरांसाठी जे अप्राप्य ते हा माणूस अगदी सहज करून दाखवतो. त्याचे आरोहण पहाताना ते इतकं अवघड असेल असं वाटतंच नाही, पण ज्यांनी कोणी थोडंफार कातळारोहण केलंय त्यांना क्रिस जे करतो ते किती अवघड आहे याची कल्पना येईल. अंगी काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय असं करणे अशक्यच आहे. एखाद्या बॅलेडान्सर सारख्या त्याच्या हालचाली असतात. त्याच्या हातात, बोटांत असणाऱ्या कमालीच्या ताकदीच्या व लवचिकपणाच्या जोरावर त्याने अवघडात अवघड केवळ स्वप्नवत अशा वाटांनी प्रस्तरारोहण केले आहे.

२००१ मध्ये क्रिसने रियलायझेशन या मार्गाने चढाई करून खळबळ उडवून दिली होती. 'Realization' हा मार्ग जाणकारांच्या मते 5.15a या श्रेणीचा आहे. अर्थात यातही वेगवेगळे प्रवाद, मते आहेतच. मानवी आरोहणाची परमोच्च मर्यादा म्हणजे ही शेवटची श्रेणी. मुळात एखाद्या प्रस्तराचा अवघडपणा मोजणे ही काही फुटपट्टी लावून अंतर मोजण्याइतकी सोपी गोष्ट नाही. क्रिस स्वत: या श्रेणी ठरविण्याच्या नादी लागत नाही. तो त्याचे काम करून मोकळा होतो. तो जे करतो ते मात्र अचाट, अतर्क्य असते. या व्हिडीओमधील 'रिअलायझेशन' पहा.



क्रिस त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या ध्यानधारणेला व त्यामधून मिळालेल्या मानसिक ताकदीला देतो. त्याच्या मते एखादे प्रस्तरारोहण हे फक्त शारीरीक ताकदीवर अवलंबून नसते, त्यासाठी मानसिक ताकदीचीही तितकीच किंवा जास्तच गरज असते. रियलायझेशन बाबत तो म्हणतो की मी मनाने खंबीर असल्यानेच हे करू शकलो, त्यामानाने शरीराची ताकद फार नाही लागली!!!. अशा वेळेला मन शांत ठेवणे गरजेचे असते, सततच्या अपयशाने खचून न जाता, निराश न होता, एकदा नाही जमलं तर दुसऱ्यांदा नाहीतर तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. . . . . पण प्रयत्न सोडायचे नाहीत, मनाची ताकदच तुम्हाला त्यातून पुढे घेऊन जाते. विजिगिषु वृत्ती म्हणजे हीच. क्रिस त्याचे मुर्तिमंत उदाहरण.

प्रस्तरारोहणाचा दुसरा प्रकार म्हणजे बोल्डरींग. यात १५-२० फुटांपर्यंतच्या मोठमोठ्या धोंड्यांवर चढाई करायची असते. यात जरी मरणाचा धोका नसला किंवा कमी असला तरी यात मुक्त चढाई करायला जास्त वाव असतो. यातही क्रिसचे कौशल्य वादातीत अफाट आहे. संपुर्ण शरीराचे वजन हाताच्या बोटांच्या टोकावर तोलून केलेल्या ह्या चढाया पहा.

chris sharma climbing witness the fitness




Tuesday, November 6, 2007

तुतारी

परवा आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-ट्वेंटी चा सामना जिंकलो. तो ही मुंबईत, महाराष्ट्राच्या खुद्द राजधानीत, क्रिकेटच्या पंढरीत. मग सुरू झाला जल्लोष. सगळीकडे उत्साहाला उधाण, क्रिकेटपटूंचं कौतुक वगैरे. पण या सगळ्यात महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेली एक बातमी कदाचित आपल्या नजरेतून निसटली.

डीजेच्या गोंगाटात दबला तुतारीचा आवाज

आणि खरोखर त्या आनंदातही वाईट वाटलं. चिडचिड झाली. तुतारीच्या अनास्थेबद्दल आणि तुतारी वादकाला मिळालेल्या वागणुकीबद्दल. वीरश्री चेतवणारा तुतारीचा तो आवाज मनात घुमला. वानखेडेवर हजारो लोकांच्या समोर आपल्या देशासाठी, क्रिकेट टीम साठी तुतारी वाजवण्याआधी त्या तुतारीवादकाचे मन अभिमानाने भरून आले असेल. सारी शक्ती पणाला लावून, जिवाच्या आर्ततेने फुंकून त्याने तुतारी वाजवली आणि कोणाला त्याचं ना कौतुक ना अप्रुप.

माझ्या महाराष्ट्राचीच सध्या अशी अवस्था आहे का? आमचा दगडधोंड्यांचा महाराष्ट्र, आमची रांगडी मराठमोळी संस्कृती, आमच्या लोककला, आमचे महाराज, आमचे गड, किल्ले सगळंच विस्मृतीत जातंय का? आमचा पारंपारीक वारसा पुढे पोचवू न शकण्याइतकी आमची पिढी करंटी निघू नये. वाढवता नाही आलं तर कमीतकमी आम्ही जुनं जपलं तरी पाहिजेच.

Tuesday, June 19, 2007

आम्ही हिंदू

माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !

दरीदरीतिल वारे हिंदू
आकाशातिल तारे हिंदू,
इथली जमीन, माती हिंदू
सागर, सरिता गाती हिंदू !

धगधगणारी मशाल हिंदू
आकाशाहुन विशाल हिंदू,
सागरापरी अफाट हिंदू
हिमालयाहुन विराट हिंदू !

तलवारीचे पाते हिंदू
माणुसकीचे नाते हिंदू,
अन्यायावर प्रहार हिंदू
मानवतेचा विचार हिंदू !

महिला, बालक, जवान हिंदू
खेड्यामधला किसान हिंदू,
शहरांमधुनी फिरतो हिंदू
नसानसांतुन झरतो हिंदू !

प्रत्येकाची भाषा हिंदू
जात, धर्म अभिलाषा हिंदू
तुकाराम अन कबीर हिंदू
हरेक मस्जिद, मंदिर हिंदू !

इथला हरेक मानव हिंदू
अवघी जनता अभिनव हिंदू,
झंझावाती वादळ हिंदू
हिंदू हिंदू केवळ हिंदू !

शंभर कोटी ह्रदये हिंदू,
हजार कोटी स्वप्ने हिंदू,
असंख्य, अगणित ज्वलंत हिंदू
अखंड भारत, अनंत हिंदू !!!

कवी/कवयित्री : अज्ञात

Tuesday, May 8, 2007

आजच्या इ-सकाळची 'गं'मत चाचणी!


मोब्लॉबिंग हा एसएमएसला पर्याय ठरेल, असे वाटते का?

१. हो
२. नाही
३. माहित नाही

मुळात महाजालावर ब्लॉग लिहिणे आणि एस्एम्एस् करणे या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे?

या दोन्ही कल्पना पुर्णपणे वेगळ्या आहेत. दोन्ही गोष्टींचे मुलभूत उद्देश वेगळे आहेत. एस्एम्एस् केला जातो आपला निरोप फक्त इच्छित व्यक्तीपर्यंत तत्काळ पोचवण्यासाठी तर जालनिशी लिहिली जाते आपले विचार सर्वांपर्यंत कायमस्वरुपी पोचवण्यासाठी किंवा नोंद ठेवण्यासाठी. एस्एम्एस् चे आयुष्य मर्यादित असते. सर्वसाधारणपणे दुसऱ्या व्यक्तीला निरोप मिळाला कि एस्एम्एस् चे अस्तित्व संपुष्टात येते. तर आपले जालनिशीवरचे लेख नेहमीच उपलब्ध रहावेत अशी लिहिणाऱ्याची इच्छा असते.

इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे एखादे उपकरण दुसऱ्याला जोडणे, एका उपकरणाकडून माहिती घेऊन दुसऱ्याला देणे तितकेसे अवघड राहिलेले नाही. जालनिशी तुम्ही संगणकाचा दृश्यफलक व कळफलक वापरुन लिहा किंवा मोबाईलचा दृश्यफलक व कळफलक वापरुन लिहा, अर्थ एकच. एखादी गोष्ट करण्यासाठी मार्ग कुठलाही वापरा, हवा तो परिणाम साध्य झाला म्हणजे झाले.

मोबाईल वरुन एस्एम्एस् करणे किंवा संगणकाचा वापर करुन याहू किंवा तत्सम मेसेंजर वरुन एस्एम्एस् करणे यातही तसाच काहीही फरक नाही. मार्ग दोन परिणाम एक.

सकाळच्या कोणा नव/उप/कार्यकारी/सहसंपादकाला हि कल्पना सुचली ते मुख्यसंपादकच जाणोत. आश्चर्याची गोष्ट अशी की इ-सकाळच्या वाचक वर्गापैकी ४०% पेक्षा जास्त वाचकांना मोब्लॉगिंग हा एस्एम्एस् ला पर्याय वाटतो!!!




तुम्हाला काय वाटतं?